आपला जिल्हाकृषी

धक्कादायक! प्रोत्साहन ५० हजार अनुदान खात्यावरुन गायब; डॉ. गणेश ढवळे यांची एसपी कडे तक्रार

जिल्हा बँक शाखेचे अधिकारी व कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात!

लोकगर्जनान्यूज

बीड : नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजना घोषित करुन शेतकऱ्यांसाठी ५० हजार अनुदान देण्यात येत आहे. परंतु चौसाळा येथील जिल्हा बँकेच्या शाखेत खाते असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यातून अनुदानाची रक्कम परस्पर गायब झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, शाखेतून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने संबंधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली. शाखेतील कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून, तुमच्या सोबत असे घडले का? तपासून पहा.‌

शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. याचा लाभ केवळ थकित कर्जदारांना झाला. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागल्याने शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजना सुरू केली. यातून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान दिले जात आहे. हे ५० हजार अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र यात शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे उघडकीस आले असल्याने खळबळ माजली आहे. चौसाळा ( ता. बीड ) येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,शाखेत गोलंग्री ( ता. बीड ) येथील शेतकऱ्यांचे खाते आहेत. शिवाजी प्रल्हाद कवडे, लक्ष्मण प्रल्हाद कवडे, बाळू दगडु पवार, वृंदावनी बाबासाहेब कदम, सुरेश बारीकराव कवडे या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर अनुदानाची ५० हजार रक्कम जमा झाल्याचे मेसेज आले. चौसाळा येथे शाखेत गेले असता २५ हजार रुपये परस्पर उचलल्याचे दिसून आले. याबाबत शाखेत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे. त्यामुळे आज मंगळवारी ( दि. २७ ) या फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांच्या माध्यमातून बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरील रक्कम परस्पर गायब झालीचं कशी याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. तसेच यामागे मोठं रॅकेट तर नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे. झालेला प्रकार गंभीर असल्याने शेतकऱ्यांनी लेखी निवेदन देताच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी नेकनूर पोलीस ठाणे प्रमुख यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. असे प्रकार इतर ठिकाणी घडले का? यासाठी प्रोत्साहन अनुदान योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी आपले खाते तपासून पहावीत असे आवाहन डॉ. गणेश ढवळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »