शेत तलावात बुडून महिलेचा मृत्यू सहा महिन्यांतील केज तालुक्यातील तीसरी घटना

केज : पाणी आणण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय महिलेचा पाय घसरुन शेततळ्यात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील लव्हुरी येथे घडली आहे .शेत तलावात बुडून मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असू यापुर्वीही लाडेवडगाव आणि आडस येथे शेत तलावात बुडाल्याने तिघांना प्राण गमवावे लागले असून ही तिसरी घटना आहे.
ज्योती ज्ञानेश्वर चाळक ( वय २८ वर्ष ) महिलेचे नाव आहे .लव्हुरी येथील ज्ञानेश्वर चाळक यांची सर्वे नं.१९८ मध्ये जमीन आहे . त्यांची पत्नी ज्योती चाळक या सोमवारी ( दि.६ ) सकाळी शेतात गेल्या होत्या . पिण्यासाठी पाणी लागणार म्हणून त्या पाणी आणण्यास गेल्या होत्या. पाणी काढीत असताना पाय घसरुन शेततळ्यात पडल्या . त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला . घटनेची माहिती मिळताच केज ठाण्याचे जमादार चाँदपाशा सय्यद , पोलीस नाईक धन्यपाल लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने बाजाच्या साहाय्याने ज्योती चाळक यांचा मृतदेह शेततळ्याच्या बाहेर काढला . केज उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. राजाभाऊ बजरंग चाळक यांच्या खबरेवरुन केज पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून जमादार उमेश आघाव पुढील तपास करत आहेत . मयत ज्योती चाळक यांना दोन मुले आहेत. ती आईच्या मायेला पोरकी झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. यापुर्वीही शेततळ्यात बुडून आडस येथील एक तरुण तर लाडेवडगा येथे दोन चिमुकले सख्खे भाऊ असे तिघांचे मृत्यू झाले असून या तिसऱ्या घटनेत चौथा मृत्यू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेततलाव बाबतीत दक्षता घेत महिला,मुले, पोहता न येणाऱ्यांना रोखण्यात यावं असे मत व्यक्त करण्यात येत आहे.