राज्यातील निर्बंध हटणार का? राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या विधानामुळे चर्चा

दररोज रुग्ण बरं होण्याचं प्रमाण बाधित रुग्णांपेक्षा जास्त आहे. आपल्याला आता कोरोना सोबत जगावं लागणार, त्यामुळे कोविड बरोबर जगायचं शिकावं लागणार असे विधान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. तसेच पाश्चिमात्य देशांमध्ये रुग्णसंख्या वाढत असतानाही निर्बंध कमी केले आहे. केंद्र शासन, आयसीएमआर ( ICMR ), टास्क फोर्सने मार्गदर्शन केलं तर आम्हालाही कोविडबरोबर कसं जगता येईल याबद्दल नागरिकांचे प्रबोधन करता येईल. असे म्हणले असता महाराष्ट्रातील कोरोना बाबतीत असलेले निर्बंध हटणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
“इंग्लंड, डेन्मार्क, हॉलंड, युरोपीय राष्ट्रांसह अमेरिकेतही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्या ठिकाणी विशेषतः युकेमध्ये मास्कमुक्ती करण्यात आली. निर्बंध कमी केले आहेत. याबाबत राज्य टास्क फोर्स, केंद्रीय टास्क फोर्स, सर्वांना कळवलं पाहिजे की तो निर्णय जर विज्ञानाधिष्ठित असेल तर तो का घेतला कसा घेतला? आणि मग त्याबद्दल महाराष्ट्रालाही मार्गदर्शन व्हावं अशी अपेक्षा कॅबिनेटने व्यक्त केली. आम्ही त्या पद्धतीच्या सूचना कालच्या बैठकीनंतर आयसीएमआर (ICMR ), राज्य टास्क फोर्स आणि केंद्रीय टास्क फोर्सला पाठवल्या आहेत”. यासंदर्भात राजेश टोपे एका वृत्तवाहिनीला बोलत होते. मुंबई, ठाणे, पालघर या भागात रुग्ण वाढ सुरू होती. आता कमी झाली. ही दिलासादायक बाब म्हणता येईल. परंतु पुणे, नागपूर, नाशिक, औरंगबाद इथली रुग्णसंख्या वाढत आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर रुग्णसंख्या वाढत असलीतरी रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्याची गरज भासत नाही. आयसीयू आणि व्हेंटिलेटरवरचे रुग्ण १ टक्क्यांहूनही कमी आहेत. अशीही माहिती दिली. यानंतर राज्यात निर्बंध उठतील का? असा प्रश्न उपस्थित करत चर्चेला उधाण आले.