पिंपळनेरकरांचे विजेसाठी उपोषण कडकडीत बंद, नागरिक संतप्त

पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे सुरळीत वीजपुरवठा यासाठी कडकडीत बंद ठेवून महावितरण कार्यालयासमोर नागरिकांनी मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय उपोषण सुरू केले आहे.
पिंपळनेर येथे गत काही दिवसापासून विजेचा सुरळीत पुरवठा केला जात नाही. महावितरण कार्यालयात वारंवार निवेदने देऊनही काहीच फरक पडत नाही 8 ते दहा तास भारनियमन केले जाते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना वीज नसल्याने पाणी व इतर समस्यांना तोंड द्यावे लागते, तसेच व्यावसायिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागली आहे. यामुळे परिसरातील नागरिक मोठ्या अडचणीत असून महावितरण कंपनीने पिंपळनेर करांना सुरळीत वीजपुरवठा करावा, अर्बन लाईन सुरू करावी, भारनियमन कमी करावे यासह इतर मागण्यांसाठी दि. 22 एप्रिल रोजी सकाळी माजी जि.प.सदस्य मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. यावेळी महावितरण चे अभियंता उपस्थित होते. नागरिकांनी कर्मचारी व महावितरणच्या अपयशी कारभाराचा पाढाच वाचला. अनेक तक्रारी करूनही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिक संतप्त असून त्वरित वीज पुरवठा सुरळीत न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला. या उपोषणाला मनोज पाटील, सरपंच भारत जवळकर, शेख शरीफ, शेख निसार, माउली जाधव, दत्ता कदम, उमेश आनेराव, श्रीकांत ठोकरे, विशाल इतापे, माधव नरवडे, सुनील पाटील, संतोष मेहत्रे, दादा पवार, नितीन इथापे, शेख सलीम, भगवान जाधव, सुंदरराव शिरसाट सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.